Wednesday, September 27, 2017

जर्मन रहिवास

काही लोकांना आपण “बॅटरी चार्ज करून घ्यायला” भेटतो. राजगुरू सर त्यापैकी एक. सर आता सत्तरीच्या वर आहेत. कॉलेजमध्ये ते आम्हाला शिकवायचे त्या काळात ते टेनीस खेळायचे. बत्तीस वर्षं खेळल्यावर आता टेनीस बंद झालेय, पण व्यायाम आणि तंदुरुस्तीविषयी जागरूकता अजूनही आहे. सरांच्या दोघी मुली लग्न होऊन परगावी / परदेशी राहणार्‍या, घरात ते दोघेच. पण त्यांचं घर आणि मन स्वतःच्या म्हातारपणातच अडकलेलं नाही.  “आमच्या वेळी असं होतं, आता सगळं कसं वाईट झालंय” किंवा ”हल्ली मान दुखते, चालायला त्रास होतो, ऐकू येत नाही” यापलिकडेही बर्‍याच गोष्टींविषयी त्यांच्याशी गप्पा होतात. (त्यांना म्हातार्‍यांपेक्षा तरुणांचा सहवास आवडतो, “आम्हाला तू टाळतोस!” अशी त्यांच्या म्हातार्‍या मित्रांची तक्रार असते.;) ) अजूनही ते घरी येणार्‍या विद्यार्थ्यांना शिकवतात. आम्ही कॉलेजमध्ये होतो तेंव्हा सरांनी सांगितलेलं आठवतंय, “ग्रेसफुली म्हातारं होणं ही सुद्धा कला असते.” हे ग्रेसफुली म्हातारं होणं कसं असतं ते सरांकडून शिकावं. खूप दिवसांपासून त्यांना भेटायला जायचं होतं. अखेर या महिन्यात तो योग जुळून आला, आणि सरांची भेट झाली.

***

सरांकडे “जर्मन रहिवास” असं पुस्तक दिसलं, सहज चाळायला घेतलं, आणि पहिल्या काही पानातच पुस्तकात गुंगून गेले. खानदेशातल्या भालोद या छोट्याशा गावातला तुकाराम गणू चौधरी हा तरूण आपल्या दोघा मित्रांसह १९२२ ते १९२५ अशी तीन वर्षं कापडनिर्मिती तंत्रज्ञान शिकायला जर्मनीमध्ये राहिला. या काळाविषयीचे आत्मकथन या पुस्तकात आहे. पुस्तकातल्या काही जर्मन भागाच्या भाषांतरामध्ये सरांचा सहभाग होता. सरांकडून घेऊन ते पुस्तक वाचून काढलं. 

***

दोन महायुद्धांच्या मधला काळ हा जर्मनीमधला मोठा धामधुमीचा. पहिल्या महायुद्धात झालेला पराभव, त्यातली फसवलं गेल्याची भावना, तरुणांची एक अख्खी पिढी युद्धभूमीवर गमावल्यामुळे घराघराला बसलेले त्याचे चटके, बेकारी, दुर्भिक्ष्य, महागाई, कवडीमोल झालेलं आणि अजून गर्तेतच चाललेलं चलन, राजकीय परिस्थितीमध्ये होत असणारे बदल आणि अस्थिरता, त्यातून आलेली गुन्हेगारी असा सगळा हा काळ. या काळातल्या जर्मनीमध्येच हिटलरच्या उगमाची बीजं सापडतात. त्यामुळे जर्मनीकडे अशा परिस्थितीमध्ये कुणी संधी म्हणून बघत असेल असा मी विचारही केला नव्हता कधी.

जर्मनीमध्ये तेंव्हा प्रचंड चलन फुगवटा (hyperinflation) होता. म्हणजे एका ब्रिटिश पौंडाचे जर्मन मार्क हजारांमध्ये मिळत. (आज मिळालेल्या पैशांना उद्या काही किंमत राहीलच याची शाश्वती नसे!  ब्रिटिश पौंडाचा भाव २००० मार्क वरून काही महिन्यात २०००० मार्कपर्यंतसुद्धा घसरला या काळात.) त्यामुळे परदेशी विद्यार्थ्यांना जर्मनीमध्ये राहून शिकणे स्वस्त पडे. याच विचाराने हे खानदेशातले शेतकरी घरातले तिघे तरूण कुठलं आर्थिक पाठबळ नसताना, घरात विशेष शैक्षणिक पार्श्वभूमी नसतांना, कुठली ओळखदेख नसतांना हिकमतीने माहिती काढून, कसेबसे उधार – कर्जाऊ पैसे जमवून जर्मनीला जमवून शिक्षण घेण्याचं ठरवतात. त्यासाठी स्वतःच्या हिंमतीवर पैसा उभा करतात. तिथल्या कोर्सेसविषयी माहिती मिळवतात, जर्मन भाषेची तोंडओळख करून घेतात, आणि बोटीवर चढतात! त्यांच्या नजरेतून जर्मनीकडे बघणे खूपच रोचक आहे.

मुंबईहून निघाले, जर्मनीमध्ये पोहोचले, दुसर्‍यां दिवशीपासून शिकायला सुरुवात, कोर्स संपवल्यावर मायदेशी परत असा साधा सरळ प्रवास त्यांचा नाही. आर्थिक चणचण आहे, भाषेचं ज्ञान तसं तोकडं आहे. तिथल्या कुठल्या कोर्सला ऍडमिशन मिळालेली नाही. व्हिसा पॅरीसला पोहोचल्यावर काढायचा. तिथल्या रीतेरिवाजांची, पद्धतींची माहिती तितकीशी नाही. घरची पार्श्वभूमी बघता वातावरणातली तफावत तर खूपच आहे. (तिघातला एक मित्र तर शाकाहार न सोडण्यावर ठाम राहिल्यामुळे जर्मनीच्या थंडीमध्ये तग धरून राहू शकला नाही, तिथेच त्याचा मृत्यू झाला.:( ) जर्मन मार्क कोलमडल्यामुळे परकीय चलन घेऊन येणार्‍यांसाठी तिथे अभूतपूर्व स्वस्ताई होती. आणि जर्मन लोक उपाशी मरत असतांना, अन्नासाठी, उबेसाठी पैसे नाहीत म्हणून कुटुंबंच्या कुटुंबं आत्महत्या करत असतांना तिथल्या लोकांच्या डोळ्यावर येईल अशा चैनीवर पैसे उधळणारे परदेशी (भारतीय सुद्धा!) होतेच. त्यामुळे वातावरणात परक्यांविषयीची एक तेढ होती. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये या तरुणाची वेगवेगळ्या गोष्टी समजून घेण्याची, नव्याशी जुळवून घेण्याची, माणसं जोडण्याची कला आचंबित करणारी आहे. जर्मनीमध्ये तो ज्या ज्या ठिकाणी राहिला, त्या त्या गावात त्याला घरचा मानणारे आप्तस्वकीय तयार झाले. त्याला आपला मुलगा मानणार्‍या आया -  मावशा मिळाल्या. आईच्या मायेने त्यांनी त्याच्या आजारपणात सेवा केली. परदेशात हातात पैसा नसतांना, तिथल्या रहिवाशांचीच आर्थिक ओढगस्ती असतांना महिनेच्या महिने काढणं त्याला जमलं ते या जोडलेल्या माणसांमुळे.

भारतीय संस्कृती, लग्न झालेलं असताना एकट्याने शिक्षणासाठी परदेशात दीर्घ काळासाठी येणे किंवा या तिघा मित्रांमधलं प्रेम या सगळ्याविषयी त्यांच्या जर्मन स्नेह्यांना कुतुहल आहे. तिथल्या समाजजीवनाविषयी, चालीरीतींविषयीच्या यांच्या टिप्पण्याही वाचण्यासारख्या आहेत.

***

पुस्तक वाचतांना जाणवलेली अजून एक गोष्ट म्हणजे, युद्धानंतरच्या इतक्या अस्थिर, खालावलेल्या परिस्थितीमध्ये सुद्धा जर्मनीमध्ये शिक्षणाचा, कापड गिरणीतल्या कामाचा दर्जा टिकून होता. युद्धानंतर हालाखीची परिस्थिती आली, मग थर्ड राईश आलं, दुसरं महायुद्ध झालं, जर्मनीची परिस्थिती अजून हालाखीची झाली, आणि मग हळुहळू मार्शल प्लॅनच्या सहाय्याने हा देश पुन्हा उभा राहिला. आज युरोपच्या एकीकरणानंतरच्या काळात तर युरोपाच्या कुठल्याही भागातून आलेले लोक हक्काने जर्मनीमध्ये काम करू शकतात. पण तरीही जर्मन दर्जा आणि युरोपियन दर्जा यात तफावत जाणवतेच. हे रक्तातच असतं का एकेका देशाच्या?

***

जर्मन रहिवास
तुकाराम गणू चौधरी
लोकवाङ्मय गृह प्रकाशन

No comments: