Friday, March 10, 2017

भरतपूर

भटकंतीमध्ये मला अगदी पहायचंच होतं असं ठिकाण म्हणजे भरतपूर. भरतपूरमध्ये २ आकर्षणं होती माझ्यासाठी – केवलादेव घाना पक्षी अभयारण्य, आणि जाट राजा सुरजमल याचा लोहागड किल्ला.

सतराव्या शतकाची अखेर – अठराव्या शतकाची सुरुवात हा उत्तर भारतात धामधुमीचा काळ होता. मराठे, मुघल, राजपूत या महत्त्वाच्या सत्ता होत्या. त्यांच्यामध्ये सत्तेसाठी रस्सीखेच चालू होती. जाट हा शेतकरी समाज. अठराव्या शतकाच्या सुरुवातीला बदनसिंग जाट यानी जाटांना एकत्र आणून आपल्या भूमीच्या रक्षणासाठी त्यांच्या हातात शस्त्र दिलं. सुरजमल हा बदनसिंहाचा मुलगा आणि वारस. हा अतिशय कुशल योद्धा, रणनीतीचा जाणकार आणि मुत्सुद्दी. त्याने जाट सैन्याला शिस्त लावली, भरतपूर वसवलं, लोहागड, कुम्हेर हे किल्ले बांधले. त्याच्या राजवटीमध्ये जाट सत्ता उत्तर भारतातली नाव घेण्याएवढी महत्त्वाची सत्ता बनली. त्यानी बांधलेला भरतपूरचा किल्ला “लोहागड” हा खरोखरच अभेद्य होता. (१८०५ मध्ये इंग्रजांनी या किल्ल्यावर हल्ला करून ६ आठवड्यांहून जास्त काळ वेढा दिला, पण ते हा किल्ला जिंकू शकले नाहीत.)

दिल्लीतला मुघल बादशाह या काळात दरबार्‍यांच्या हातातलं खेळणं बनलेला होता. मल्हारराव होळकर दिल्लीला पोहोचून दिल्लीच्या सरदारांमधला संघर्ष संपवण्यापूर्वी सुरजमलनेही तिथे शिष्टाई केली होती. मुघल सरदारांनी सुरजमलविरुद्ध मराठ्यांकडे मदत मागितली. मरठ्यांनी १७५४ मध्ये सुरजमलच्या कुम्हेरगड किल्ल्याला वेढा घातला, पण तो जिंकू शकले नाहीत. १७५७ मध्ये पानिपतावर अब्दालीशी सामना करायला जातांनाही मराठ्यांची आणि सुरजमलची कुरबूर झाली, दुखावला गेलेला सुरजमल मराठ्यांना सामील झाला नाही. पण, तो अब्दालीलाही जाऊन मिळाला नाही. उलट युद्धानंतर नि:शस्त्र, अनवाणी, अन्नपाण्याविना परतणार्‍या पराभूत मराठी सैन्याला या राजाने पदरमोड करून आधार दिला. 

लोहागड किल्ला इंग्रजांना जिंकता आला नाही, पण आपल्या बेपर्वाईने आज त्याला हरवलं आहे. आता किल्ल्यात बघण्यासारखं फारसं काही उरलेलं नाही. किल्ला, त्याच्या आतला भाग आज भरतपूर गावाचे भाग आहेत. किल्ल्याच्या आत शाळा, दुकानं, ऑफिसं, रस्ते सगळं काही आहे. त्यामुळे किल्ला म्हणून बघायला फारसं काही मिळणार नाहीये हे आधीच माहित होतं, पण सुरजमल राजाला नमस्कार करायला किल्ल्याचा दरवाजा तरी मला बघायचाच होता. बराच वेळ "आता थोडं राहिलं, इथेच आहे!" असं ऐकत गावातल्या न संपणार्‍या अरुंद, पुढचं काहीच दिसू नये अशा वळतवळत जाणार्‍या गल्लीने चालत होतो. ती मधेमधे एवढी अरुंद वाटत होती, की पुढे गाडी जाईल का, वळवायला तरी जागा मिळेल का अशी शंका वाटत होती, त्यामुळे गाडी मागेच ठेवलेली. एकदाची ही संपली आणि किल्ल्याचा दरवाजा बघायला मिळाला. एव्हाना आमचा वेळही संपत आला होता, आणि “फक्त दरवाजा आणि तट” बघणार म्हणून मी आश्वासन दिलेलं असल्याने सोबतचे घाई करायला लागले होते. तेंव्हा आत पडझड म्हणजे नक्की काय आहे हे नीट न बघताच जड मनाने लोहागडाचा निरोप घेतला. :(





भरतपूरचं पक्षी अभयारण्य तसं खूप मोठं नाही. केवलादेव शिवमंदिराच्या जवळपासचा हा खोलगट भाग. सुरजमल राजाने अजान बांध बांधल्यावर इथे पाणथळ भाग निर्माण झाला. भरतपूरच्या संस्थानिकांनी पक्ष्यांच्या शिकारीसाठी राखलेलं हे जंगल होतं. आता याला नॅशनल पार्कचा दर्जा आहे. युरोप, रशिया, चीन आणि दक्षिण भारतातून येणारे स्थलांतरित पक्षी आणि इथले पक्षी असे मिळून इथे ३००च्या वर जातीचे पक्षी बघायला मिळतात. पक्षीनिरीक्षणासाठी सर्वोत्तम जागांपैकी हे एक मानलं जातं. आम्ही गेलो होतो ते पक्ष्यांचा अभ्यास करण्यासाठी नाही, तर माऊला पक्षी दाखवायला. (सोबत दुर्बिण होती, मोठा कॅमेरा अर्थातच नव्हता. तसंही माऊ आणि कॅमेरा हे कॉम्बीनेशन अवघडच असतं.) त्यामुळे दोन – तीन तास भटकंती करायच्या विचाराने गेलो होतो. इथल्या तळ्यामध्ये बोटीतून जाऊनही पक्षी बघता येतात, पण ते सगळे पक्षी काठावरूनही दिसले.

‘पिलू’ची गोड फळं. पोपट खात होते, आम्हीही चाखली!

Painted Stork, purple moorhen, Coot, Glazed Ibis, Egret

Painted Stork (चित्रबलाक) घरटे. इथे भरपूर घरटी होती, पिल्लांचा उडण्याचा सराव चालला होता.
पार्कमध्ये सायकलरिक्शा घेऊन जाता येतं, सायकली भाड्याने मिळतात, चालत हिंडता येतं, किंवा विजेवरच्या रिक्शाने जाता येतं. विजेच्या रिक्शा भरभर जातात, फार बघायला मिळात नाही. सायकल किंवा सायकलरिक्षाचा वेग पक्षी बघायला एकदम बरोबर होतो. वेडा राघू, पोपट, सातभाई, मोर, अशा नेहेमीच्याच भिडूंनी सुरुवात झाली, पण पुढे बरंच काही बघायला मिळालं. गरूड, घुबड, हुप्पू, चित्रबलाक (painted stork), Coot, Black Cormorant, Snake Bird,  Glazed Ibis, Spoonbill, Purple moorhen, Pelican, Flamingo, Herons, Common Kingfisher ही आठवणारी नावं. खेरीज कोल्हे, चितळं, नीलगायी भरपूर. इथली हरणं एकदम सुस्त झालीत, कारण त्यांना पळायला लावणारे मोठे मांसाहारी प्राणी नाहीतच. सद्ध्या इथे एक बिबट्या आलाय त्यामुळे जरा तरी फरक पडलाय. पार्कमध्येच राहणार्‍या गायी पण भरपूर आहेत.

एकूणात, आग्रा – फतेहपूर सिक्रीला न जाता थेट इथेच दोन दिवस घालवले असते तर जास्त मजा आली असती. पण भरतपूर आमच्या भटकंतीमधलं शेवटचं नाव होतं. यानंतर दिल्लीला जाऊन पुण्याची गाडी पकडणं एवढाच वेळ होता. माऊ मोठी झाल्यावर पुन्हा भरतपूरला निवांत जाणार मी!

No comments: