Monday, June 23, 2008

मंथन-विचार

आईकडे मी कधी लोणी काढायच्या भानगडीत पडले नव्हते. एक तर ते बाबांचं 'designated' काम होतं, आणि मी उठेपर्यंत बहुधा ताक घुसळून झालेलं असायचं. सकाळी (साखरझोपेमध्ये) बाबांचा ताक घुसळण्याचा आवाज ऐकला म्हणजे मनात ’अरे वा आज ताजं ताक मिळणार’ अशी नोंद घ्यायची आणि पुन्हा कुशीवर वळून झोपायचं एवढाच ताक घुसळणे / लोणी काढणे प्रकाराशी नियमित संबंध. भुसावळला कधीतरी मंजूकडे ताक केलं असेल किंवा एखाद्या वेळी बाबांना बरं वगैरे नसल्यामुळे कधी ताक घुसळलं असेल तेवढंच.
लग्नानंतर आम्ही ’चंद्रकांत’चं दूध घ्यायला सुरुवात केली आणि एक नवीन समस्या निर्माण झाली. एवढ्या सायीचं करायचं काय? बाबांसारखं एका दिवसाआड ताक करायला तर परवडणार नव्हतं. प्रसादचा ’साय टाकून दे’ हा पर्याय मी ताबडतोब हाणून पाडला. ’फार साय येते. दूध फार चांगलं आहे’ म्हणून दूध बदलणं फारच गाढवपणाचं वाटत होतं. अखेर आठवडाभराच्या सायीला विरजण न लावताच मिक्सरमध्ये (ताक टाकून देऊन) लोणी करायची वेळ आली.मिक्सरमध्ये ताक मी कधी केलंच काय, झोपेमध्ये ऐकलं सुद्धा नव्हतं. रविवारी तासभर खास या कामासाठी राखून ठेवून, बाई आणि प्रसाद आपले प्रयोग बघायला नाहीत याची खात्री करून घेतली. मनाचा हिय्या करून ती साय मिक्सरमध्ये घातली आणि मिक्सर लावला. त्या सायीला काही दया येईना. सुदैवाने मिक्सर प्रसादच्या ’फिलिप्स’चा होता - त्यामुळे एकीकडे साय लावून मला दुसरे उद्योग करता येत होते. अखेरीस अर्ध्या तासाने कसंतरी लोणी निघालं. विरजण लावलंच नव्हतं,त्यामुळे ताजं ताक मिळण्याचा प्रश्नच नव्हता. एवढे कष्ट करून ताक न मिळणं म्हणजे फारच झालं. पुढच्या रविवारी पुन्हा तोच प्रयोग,विरजण लावून. एक कवकवीत, बेचव रसायन ताक म्हणून उरलं. मागच्या वेळेसारखं ते धड टाकूनही देता येईना - किती झालं तरी ते शेवटी ’ताजं ताक’ होतं ना! पुढच्या वेळी ठरवलं - या मिक्सरच्या नादी लागण्यात काही अर्थ नाही. आपण आपलं साधं रवी घेउन ताक करावं.(बाबांची आठवण काढत)रवी घेऊन बसले. अर्धा तास घुसळून काही होईना. बाबा नेमके किती वेळ ताक घुसळत असावेत बरं सकाळी? तेवढ्यात कुणाचातरी वेळखाऊ फोन आला. तो संपेपर्यंत प्रसाद आला, आणि कुठेतरी बाहेर जायचं निघालं. आता या अर्धवट झालेल्या ताकाचं मी काय करू? ते तसंच टाकून शेवटी गेले. परत आल्यावर बघितलं तर ताक / साय परत मूळपदाला.
दर आठवड्याचे प्रयोग अयशस्वी होता होता अखेरीस दर रविवारी सायीची भीती वाटण्यासारखी परिस्थिती निर्माण झाली. लोणी काढणे हे माझी सगळी कल्पकता, एनर्जी आणि वेळ खाऊन टाकणारं एक ’कॄष्णविवर’ दर्जाचं, ’काळ्या यादीमधलं’ काम बनलं. दर रविवारी पुढे ढकलून शेवटी साय काढायला आणि फ्रिजमध्ये ठेवायला घरात एकाही भांड्यात कणभरही जागा शिल्लक नाही अशी परिस्थिती आल्यावर नाईलाजाने मी महिनाभराची साय एका रविवारी दिवसभर घुसळून टाकली आणि बाबांनी केलेल्या ताज्या ताकाच्या आठवणी काढत पुढच्या सायमुक्त रविवारची वाट बघत बसले. महिनाभराच्या(?) सायीसाठी एक मोठ्ठं पातेलं बनवायला सुरुवात केली, आणि महिन्याला तीनच रविवार असतात हे कटु सत्य स्वीकारण्याची मनाची तयारी केली.
असंच एकदा सायीचं ते जंगी पातेलं भरल्यावर मी शनिवारी त्याला विरजण लावून ठेवलं होतं. रविवारी नेमक्या मी घरात नसतांना दुपारी बाई कामाला आल्या. हे कसलं पातेलं आहे ते त्यांना कळेना. अखेरीस त्यांनी आणि प्रसादने "दूध नासलेलं दिसतंय" असा निष्कर्ष काढला, आणि पातेलं रिकामं करून चांगलं स्वच्छ घासून ठेवलं!
अखेर एका रविवारी ती अटळ घटना घडली. माझा साय-प्रयोग करायला एकांतच मिळेना! एवढी तयारी करून मी नेमकं काय करणार अहे, ते बघायला बरोब्बर सासुबाई आल्या. नाईलाजाने मी त्यांच्या समक्ष मिक्सर सुरू केला. त्यांनी २-४ मिनिटं एकंदर रागरंग बघितला, मग हळूच सांगितलं-"मिक्सरचं कुठलं पातं लावलं आहेस तू? फ्लिपर लावत जा. आणि मिक्सर असा फुल स्पीडला नाही चालवायचा लोण्यासाठी." पुढच्या रविवारी (सासुबाई नसतांन अर्थातच - त्या तोवर परत गेल्या होत्या हुबळीला) माझा नवा प्रयोग. दहा मिनिटांत लोणी तयार, आणि शिवाय पिणेबल ताजं ताकसुद्धा!
जवळजवळ वर्षभर चाललेल्या या लोणी प्रकल्पामधून एक ’मंथन थिअरी’ तयार झाली माझ्याजवळ. पहिली गोष्ट म्हणजे, आपण घाईकरून मंथन लवकर संपत नाही. दुसरं म्हणजे, या मंथनातून काहीही निष्पन्न होणं अशक्य आहे असं वाटायला लागेपर्यंत आपल्याला कुठलीच प्रगती दिसत नाही. खूप वेळ तुम्ही नुसतेच प्रयत्न करत राहता, दॄष्य परिणाम काहीच नसतो. या स्थितीमध्ये प्रयत्नांना चिकटून रहावंच लागतं. त्यानंतर जेंव्हा परिणम दिसायला लागतो, तेंव्हा होणारा आनंद खास असतो. या वेळेपर्यंत ’by grace of God things are taking place' असं म्हणण्याची आपल्या मनाची तयारी झालेली असते, कर्ताभाव संपलेला असतो. तिसरा मुद्दा म्हणजे परिणाम दिसायला लागले म्हणून ताबडतोब थांबण्यासारखा गाढवपणा नाही. अजून थोडंसं टिकून राहिलं तर याच्या कितीतरी पट जास्त फळ मिळतं. Take things to their logical conclusion. चौथी गोष्ट म्हणजे,अत्याधुनिक सधनं हा तुमच्या अडाणीपणावरचा उतारा नाही. ती कशी वापरायची हे तुम्हाला कळायला हवं. आणि शेवटचं म्हणजे, ask your mom in law... she also knows something.

5 comments:

Trupti said...

hi gouri,

sahiiiiich ahe 'manthan theory'. khoop mast lihile ahes.....ek prasha : lonyache kay kartes ?

Gouri said...

लोण्याचं तूप ... तेही संपत नाही घरात, पण तुपाला भरपूर गिर्‍हाईक असतं!

Anonymous said...

Ask ur mom in law she also knows something...........sahi....
bakiche dahyache tak/loni kadhane, idliche pith dalane, sakalacha pahila chaha karane...hi kame aamachyahi gharat babanchich...

रोहन... said...

रगडीता कण वाळूचे तेल ही गळे... फिरविता भांडे मिक्सरचे ताक ही निघे ... :)

प्रयत्नांना दाद आहे.. :)

Gouri said...

रोहन, शेवटी ताक मिळण्याचा प्रश्न आहे ना :)